मंचर ता.आंबेगाव येथे पराग उद्योग समुह व देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन यांच्यावतीने श्रीराम मंदिर,मंचर व पराग डेअरी येथे प्रसाद म्हणून पाच हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे, या सोबत घरोघरी लावण्यासाठी पणती वाटप करण्यात येणार आहे.
अयोध्या येथे श्रीराम मंदिर पूर्ण झाले असून दि. २२ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून देशभरातील हिंदू बांधवांच्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दि. २२ रोजी मंचर ता. आंबेगाव येथे देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन यांच्यावतीने मंचर येथील जैन मंदिर, राम मंदीर, हनुमान मंदिर, शनी मंदीर, गणपती मंदिर, मुक्तादेवी मंदीर ही मंदिरे स्वच्छ धुऊन मंदिरांमध्ये फुलांची सजावट करून आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिरांमध्ये दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. यावेळी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उद्योजक देवेंद्रशेठ शहा तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसाद म्हणून तीन हजार लाडू वाटप करण्यात येणार आहे.
पराग उद्योग समूहाच्या वतीने उच्च प्रतीच्या गोवर्धन घी मध्ये बनवलेले साजूक तुपातील ५००० मोतीचूर लाडू भाविकांना वाटले जाणार आहे. त्यासाठी दीडशे किलो साखर ,७५ किलो बेसन पीठ, १०० किलो शुद्ध गोवर्धन घी ,प्रत्येकी पाच किलो काजू व बदाम, केशरचे २५ डबे यांचा वापर केला जाणार आहे. २१ कामगार रात्रंदिवस लाडू बनवण्याचे काम पराग डेअरी येथे करत आहे. येथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे . लाडू बनवण्याच्या कामाची पाहणी परागसमूहाचे उपाध्यक्ष संजय मिश्रा, महाव्यवस्थापक गजानन पाटील, अयोध्या निवासी रवींद्र गुप्ता, दीपक शर्मा, विकास भोर, अशोक अण्णा निघोट यांनी केली. यावेळी प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष करण्यात आला. पराग उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले अयोध्या येथे प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होत असून भारत देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. शेकडो वर्षाचे स्वप्न भाविकांचे साकार होणार आहे.